Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    10 हजार पदवीधर मतदानाला मुकणार, गोपीचंद पडळकर यांची भीती;

     


    10 हजार पदवीधर मतदानाला मुकणार, गोपीचंद पडळकर यांची भीती;


    मुंबई: राज्यात पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पदवीधरांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केला आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने पेच वाढला आहे. एकाच तारखेला परीक्षा आणि निवडणुका असल्याने एक दोन नव्हे तर दहा हजार पदवीधर मतदानापासून वंचित राहणार असल्याची भीती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे. पडळकर यांनी याबाबतचं पत्रंच निवडणूक आयोगाला पाठवलं असून या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

        नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात एका जागेसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत.

    अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यात एकूण 34 उमेदवारांपैकी एकूण 33 उमेदवारांची उमेदवारी अर्ज वैध ठरले. गजानन नेहारे या एका उमेदवाराचे वय 30 पेक्षा कमी असल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले. 16 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

    गोपीचंद पडळकर यांचं पत्रं जसंच्या तसं

    प्रति,

    निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

    जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे.

    भारत हा युवकांचा देश आहे. या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम ‘पदवीधर’ आमदार करतात. मात्र तब्बल 10 हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या गंभीर मुद्द्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी लिहीत आहे.

    येत्या 30 जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी विविध विभागांच्या परिक्षा होणार आहेत.

    राज्यातील विविध ठिकाणी परिक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. शिवाय त्या दिवशी दोन सत्रात या परिक्षा पार पडणार आहेत. या सर्व कारणांमुळे तब्बल 10 हजारांहून अधिक उमेदवार ‘पदवीधर’ आमदार निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.

    लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचं काम निवडणूका करत असतात. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशा या गंभीर मुद्द्याची दखल आपण घ्याल, यावर आपण सकारात्मक तोडगा काढाल अशी अपेक्षा माझ्यासह 10 हजार पदवीधर मतदारांना आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad