Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    ठाकरेंसाठी बालाजीला पायी जाताना शिवसैनिकाचं निधन

     


    ठाकरेंसाठी बालाजीला पायी जाताना शिवसैनिकाचं निधन


    बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी बीड मधील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी २०२१ मध्ये तिरुपती बालाजीसाठी पायी यात्रा काढली होती. परंतु, या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुईकर कुटुंबाची जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेनं घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी मंत्री असताना दिलेला शब्द आज मुख्यमंत्री असताना पूर्ण केला आहे.


    तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावा असा नवस या कडवट शिवसैनिकाने केला होता. बीड ते तिरुपती बालाजी असा पायी जाण्याचा संकल्प केला. त्यांनी त्याच दिशेने प्रवास सुरू होता. मात्र, कर्नाटक पर्यंत पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर संपूर्ण रुईकर कुटुंब उघड्यावर आले. घरातील पत्नी, मुलगी, मुलगा आणि वयोवृद्ध वडील रुईकरांवर अवलंबून होता. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबांला आधार दिला. ठाणे जिल्हा शिवसेनेनं रुईकर कुटुंबाची जबाबदारी घेतली होती.


    एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय बाजीराव चव्हाण यांनी दीड वर्षानंतर आज रुईकरांचं टोलेजंग घर बीड शहरातील बोबडेश्वर परिसरात पूर्ण झालं असल्याची माहिती दिली. दोन बेडरूम हॉल किचन असं हे घर असून यात सर्व साहित्य रुईकरांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. मात्र या घराच्या लोकार्पणावेळी रुईकरांच्या पत्नीने उद्धव ठाकरें विषयी खंत बोलून दाखवली. ठाकरेंसाठी जीव गेला मात्र त्यांच्याकडून नंतर कोणतीही विचारपूस झाली नाही यांचं खूप वाईट वाटतं पतीच निधन ही वाया गेलं असल्याचं रुईकरांच्या पत्नीने म्हटलं आहे.

    आता या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री असताना दिलेला शब्द पाळला म्हणून राजकीय चर्चा होतच आहे. परंतु सामाजिक स्तरातून त्याचे कौतुक देखील केले जात आहे. शिवसेनेचे कट्टर आणि कडवट कार्यकर्ता असलेल्या सुमंत रुईकर यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा फक्त शब्द दिला मात्र या दीड वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंचा साधा फोन नाही किंवा भेटही नाही. आदित्य ठाकरे यांचा बीड जिल्ह्यात दोन वेळेस दौरा झाला मात्र यावेळेस तरी ते भेट घेतील असं वाटल्याचं रुईकर यांच्या पत्नी म्हणाल्या.
    शिवसेनेचा एक खंदा आणि कट्टर कार्यकर्ता गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत दिलेला शब्द पूर्ण केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील होऊ लागली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad