Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

     



    महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू


    नवी मुंबई: खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. हा मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या आणखी एका श्रीसेवकाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा श्रीसेवक कल्याण येथील असल्याचे समजते. कालच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणाऱ्या अनुयायांनी खारघर येथे मोठी गर्दी केली होती. सकाळी १० वाजताचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत लांबला. त्यामुळे इतके तास श्रीसेवक रणरणत्या उन्हातच बसून राहिले होते. अनेक तास पाणी न मिळाल्याने आणि वरुन कडक उन्हाच्या झळांमुळे अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. जवळपास ३०० श्रीसेवक उष्माघातामुळे अस्त्यवस्थ झाले होते. यापैकी २६ जणांवर सध्या नवी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील रुग्ण नवी मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये विखुरले आहेत. त्यामुळे काल उष्माघातामुळे नेमक्या किती जणांची प्रकृती बिघडली होती, किती जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले, याविषयी ठोस माहिती अद्याप कळू शकलेली नाही.


    महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या सोहळ्यातील राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकांचे बळी गेले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्यात इतके उष्ण वातावरण असतानाही हा कार्यक्रम दुपारी का घेण्यात आला? हा कार्यक्रम संध्याकाळी घेता आला नसता का?, असे अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.

    जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर सडकून टीका


    काल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले. खरतरं ‘भारतरत्न’ सारखा पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जातो. पण, संपूर्ण जगभर त्याचे प्रक्षेपण केले जाते. हा कार्यक्रम देखिल त्यापद्धतीने करता आला असता. ह्या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असं दाखवायचं हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होतं.

    स्वत: सरकारतर्फे आव्हान केले जाते की, काम नसेल तर उन्हामध्ये जाऊ नका आणि इथे मात्र सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावलं होतं. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही. प्रचंड ऊन. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते.

    त्यामुळे आता भाविकांच्या मनात प्रचंड राग आहे. मतांच्या राजकारणासाठी एका संताचा वापर होऊन त्या संतांच्या भाविकांचा मृत्यू होणे हे त्या संतांना मानणा-या कुटुंबापैकी कोणालाच आवडणारे नाही. किंबहुना माझे तर असे मत आहे की, हे संतांनाही आवडलं नसेल. त्या वादात मला पडायचं नाही. पण, ह्या मृत्यूची जबाबदारी कोणालातरी घ्यावीच लागेल. जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का ? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते ? हा कार्यक्रम संध्याकाळी देखिल घेता आला असता. भरदुपारी सुर्य माथ्यावर असतांना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती ?

    संतांचा आणि धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. आणि नंतर मतं आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे.... यापुढे देखिल येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची ?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad