Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    शरद पवारांच्या एका निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रियांच्या ताब्यात, लोकसभा तिकीटवाटप सुळेंच्या हातात

     

    शरद पवारांच्या एका निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रियांच्या ताब्यात, लोकसभा तिकीटवाटप सुळेंच्या हातात



    मुंबई:शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी शनिवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेमणूक केल्याची घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर एक महिन्यातच पक्षात हा बदल करण्यात आला असून, सुप्रिया सुळे या वडील शरद पवार यांच्यानंतरच्या राष्ट्रवादीतील सर्वात शक्तिशाली नेत्या म्हणून पुढे आल्या आहेत.
    सुप्रिया सुळेंच्या सोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्यावरही कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असली, तरी सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्राची व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भार सोपवण्यात आला असून, राष्ट्रवादीची सगळी सूत्रे ही आता जवळपास सुळे यांच्या ताब्यात आल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदारांच्या अस्वस्थतेतून पक्षात मोठी फूट पडते किंवा कसे? असे वातावरण काही महिन्यांपूर्वी होते. त्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत, आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणाही केली होती. त्याच कार्यक्रमात युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत उपोषणाचीही धमकी दिली होती. पक्षाचे शक्तिशाली नेते अजित पवार यांनी त्यावेळी साहेबांना नवे नेतृत्व आणायचे असल्यास तुम्ही विरोध करणारे कोण, असा सवाल करत या राजीनामानाट्याच्या दरम्यानच अनेकांना त्यावेळी झापले होते.

    अजित पवार यांच्यावर महाराष्ट्रातील राजकीय निर्णय घेण्याची जबाबदारी देऊन सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद दिले जाईल, असा अनेकांचा त्यावेळी होरा होता. मात्र, पवार यांच्या राजकीय गुगलीने पुन्हा एकदा भल्या भल्या मंडळीचा त्रिफळा उडवल्याचे दोनच दिवसांत सिद्ध झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य जनाधार हा केवळ महाराष्ट्रातच असल्याने या पक्षात राहून राष्ट्रीय पातळीवर राजकारण करण्याला मर्यादा असल्याने, सुळे यांच्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदासोबतच महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तयारीचीही जबाबदारीही सुळे यांच्याकडे दिली गेल्याने निवडणुकीच्या तिकीटवाटपातही त्यांचा वरचष्मा राहणार असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील सुळे यांच्याच मर्जीतले मानले जातात.

    राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी जाहीर केलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये सुळे यांचे विश्वासू समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावरही बिहारसह अन्य काही राज्यांची जबाबदारी तसेच एसएसटी सेल, ओबीसी सेल यांचीही जबाबदारी देण्यात आलेली आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या नावावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नंतरच्या सर्वात शक्तिशाली नेत्या म्हणून शिक्कामोर्तब झाल्याचे पक्षातील बहुतांश सगळ्या नेत्यांनी मान्य केल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad