Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस, रेल्वेसेवा विस्कळीत; रस्ते वाहतुकीचा खोळंबा

     




    कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस, रेल्वेसेवा विस्कळीत; रस्ते वाहतुकीचा खोळंबा


     ठाणे : कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून कडाक्याचे उन पडलेले असताना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. कल्याण पूर्वेकडील अनेक बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले, तर कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने जवळपास अर्धा तास वाहतूक बंद झाली होती. रेल्वेरुळांवरही पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली. परिणामी, कामावरून परतणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

    गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासूनच ढगांचा कडकडाट, विजांचा लखलखाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. केवळ अर्धा तास पडलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने दोन्हीकडील वाहतूक बंद झाली, तर कल्याण मार्गावरील काटे नाका परिसर जलमय झाल्याने कल्याण-शिळ मार्गावरही वाहतूककोंडी झाली. कल्याण पूर्वेकडील तिसगाव, आडवली, ढोकळी परिसरातील चाळींतील घरात पाणी शिरले. येथील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. गटाराचे घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.

    पाच वाजण्याच्या सुमारास पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, मात्र तरीही संध्याकाळी उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. दुसरीकडे, या पावसाचे पाणी रेल्वेरुळांवर साचल्यामुळे काही काळ रेल्वेसेवा बंद झाली. त्यानंतर सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पाऊस पडल्यानंतर कल्याण-डोंबिवलीमधील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. संध्याकाळी उशिरापर्यंत तो पूर्ववत झाला नव्हता. गणेश मंडपांमध्ये अंधार पसरला होता. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. शहरातील अनेक रस्ते बंद झाले.

    नवी मुंबईत दमदार हजेरी

    नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन तासांत शहरात २०.६० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. यात जोरदार वाऱ्यासह काही भागात विजाही कडाडल्या. वाशीत दोन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे रस्त्यावर काही वेळ पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. नेरूळमध्ये २६.७०, तर ऐरोलीत २६.६० मिमी पावसाची नोंद झाली.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad