मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात वाजलं; जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही ठेका घेतलाय…
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणानंतर आता संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जरांगे पाटील हे मराठा तरुणांना जागृत करत आहेत. त्यांना आरक्षणाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात आहे. तसेच त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी अबालवृद्ध आणि महिलाही मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. हिंगोलीच्या कळमनुरीत ते आज आले होते. यावेळी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्य सरकारलाही इशारा दिला.
मनात आणि मतात बदल करा
भुजबळ आमचे वैयक्तिक दुश्मन नाहीत. ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. तुमचं जीवमान उंचावलं. तेव्हा मराठ्यांनी तुम्हाला कधी विरोध केला नाही. तुमच्या प्रगतीच्या आणि आरक्षणाच्या आड आम्ही आलो नाही. मग आम्हाला मोठं करताना तुमची ही भावना अशी का? काय चुकीचं बोलतो आम्ही? असा सवाल करतानाच छगन भुजबळ यांनी त्यांच्या मतात आणि मनात बदल करावा. मराठा समाज त्यांच्या पाठी उभा राहील, असं जरांगे पाटील म्हणाले.