यंदा मान्सूनची 8 दिवस आधीच हजेरी, मान्सून लवकर येण्यामागची कारणं काय? - latursaptrangnews

Breaking

Thursday, May 29, 2025

यंदा मान्सूनची 8 दिवस आधीच हजेरी, मान्सून लवकर येण्यामागची कारणं काय?

यंदा मान्सूनची 8 दिवस आधीच हजेरी, मान्सून लवकर येण्यामागची कारणं काय?


नैऋत्य मोसमी वारे आज आणखी पुढे सरकले असून आता मराठवाड्यात आणि विदर्भाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

भारतीय हवामान विभागानं 28 मे रोजी जाहीर केलेल्या नकाशानुसार, मान्सूनची उत्तरेकडची सीमा आता मुंबई, अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यांमधून जाते आहे.

पुढच्या 2 दिवसांत मान्सून छत्तीसगड, ओडिशासोबतच ईशान्य भारताचा उर्वरीत भाग, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये आगेकूच करेल.

IMD

फोटो स्रोत,IMD

दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढली असून पुढच्या 24 तासांत त्याचं डिप्रेशनमध्ये रुपांतर होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

त्याच्या प्रभावाखाली बंगाल आणि ओडिशाच्या भागात जोरदार पावसाचं भाकित हवामान विभागानं केलं आहे.

तसंच या प्रदेशात समुद्र खवळलेला असल्यानं 30 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात किनारी भागातही मासेमारीसाठी जाऊ नये अशी सूचनाही केली आहे.

28 मे रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे, तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यातला घाट प्रदेश, विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिममध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये पावसासाठी यलो अलर्ट आहे. राज्यात इतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वाऱ्याची शक्यता पाहता यलो अलर्ट आहे.

29 मे साठी विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. त्याशिवाय गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर आणि जळगाव या जिल्यांत तसंच पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट प्रदेशात आणि रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट आहे.

मान्सूनचं वेळेआधी आगमन

यंदा मान्सून 26 मे रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तब्बल 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला होता. 75 वर्षांत पहिल्यांदाच मान्सून एवढ्या लवकर मुंबईत दाखल झाला.


केरळमध्येही तो 24 जूनला म्हणजे नेहमीपेक्षा 8 दिवस आधी दाखल झाला.

भारताच्या मुख्य भूमीवर मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची ही 2009 नंतरची पहिलीच वेळ ठरली. 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाला होता.

यावेळी मान्सून लवकर तर आलाच आहे पण अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा प्रवासही वेगाने झाला.

या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनलाही गती मिळाली आणि तो वेळेआधी महाराष्ट्रात दाखल झाला.

2025 मध्ये मान्सून कसा असेल? महाराष्ट्रात किती पाऊस पडेल?

यंदा मान्सूनच्या काळात महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला होता.

2025 या वर्षी आगामी मान्सूनसाठीचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागानं जारी केला होता.

त्यानुसार देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 105 टक्के पावसाची शक्यता आहे. लडाख, तामिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

IMD map

फोटो स्रोत,IMD

महाराष्ट्रात कोकणातला किनारी भाग, मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता बरीच जास्त आहे.

तर राज्यात इतर बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं दिलेल्या नकशातून दिसून येतं.

मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे दोन प्रकार कोणते?

काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.

दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

माळशेज घाटात जमलेलेे मान्सूनचे ढग

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,माळशेज घाटात जमलेलेे मान्सूनचे ढग

भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.

तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.

मान्सून ऑनसेट म्हणजे काय?

फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.

केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.

दरवर्षी अंदमान-निकोबारमध्ये साधारणपणे 20 मे पर्यंत मान्सून ऑनसेट होतो, म्हणजे मान्सून दाखल होतो. 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि 7 ते 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो.

नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.

भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मान्सूनचा काळ साधारण 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा आहे. तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.

मान्सून कुठे तयार होतो?

मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.

पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.

जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.

जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.

पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.

अरबी समुद्राकडून भारतीय द्वीपकल्पाकडे वाहणारे वारे

फोटो स्रोत,BBC Weather

फोटो कॅप्शन,अरबी समुद्राकडून भारतीय द्वीपकल्पाकडे वाहणारे वारे

भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.

परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.

ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.

मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?

भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.

भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.

मान्सून का महत्त्वाचा?

जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.

पाऊस

फोटो स्रोत,Getty Images

फोटो कॅप्शन,भारतातली शेेती मान्सूवरच अवलंबून आहे.

मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.

भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.

भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.

1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.

एल निनो, ला निना आणि मान्सून

एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

एल निनो

पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.

IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.

त्याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होतो.

मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो

मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या तीन गोष्टी आहेत :

1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.

IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.

2. एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती.

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.

4. जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.

No comments:

Post a Comment