Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    कुंकवापलीकडची संक्रांत! विधवा महिलांना मानाचं वाण, बीडमध्ये साजरी झाली अनोखी संक्रांत

     


    कुंकवापलीकडची संक्रांत! विधवा महिलांना मानाचं वाण, बीडमध्ये साजरी झाली अनोखी संक्रांत


    बीडः पती निधनानंतर पदरात पडलेल वैधव्य यावर मात करत बीडच्या आधुनिक सावित्रीने रूढी परंपरेची बंधनं झुगारून, वैधव्य आलेल्या १०१ महिलांनी संक्रांतीच्या आदल्या दिवशीच तिळगुळाबरोबर विचारांचे वाण लुटत आगळी वेगळी संक्रांत साजरी केली.

    बीडच्या काकडहिरा गावात मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी गावातील विधवा महिलांनी एकत्रित येत कुंकवापलीकडची संक्रांत साजरी केली. गावातील विधवा १०१ महिलांना साडी वाटप करून तिळगूळ वाटप करतं सुखदुःखाचे वाण लुटण्यात आलं. शहीद जवानांच्या पत्नी मनीषा जायभाये व जिल्हा परिषद शिक्षिका प्रतिभा हावळे यांच्या संकल्पानेतून हा उपक्रम गेल्या ६ वर्षांपासून घेण्यत येतो. या कार्यक्रमातून आम्हालाही सन्मानाने जगू द्या अशी मागणी सामूहिकरित्या या महिलांनी केली आहे.

    अपघाताने ऐन तारूण्यातच वैधव्य आलेल्या महिलेला समाजात दुय्यम स्थान दिले जाते. शुभ कार्य असो की, सण उत्सव. तर, महिलांचा विशेष मकरसंक्राती सारखा सण असो, या वेळी मिळणारी वागणूक हि अपमानजनक असते. हेटाळणीच्या नजरेतून पाहिले जात, अपशकूनी समजलं जात, आम्ही सुद्धा माणस आहोत आम्हाला सन्मानाने जगू द्या, असे आवाहन प्रतिभाताई आणि मनीषाताई यांनी केले आहे यांनी केले आहे.


    काकड हिरा गावातील तब्बल १०१ महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. पती निधनानंतर पहिल्यांदाच आम्ही असं सार्वजनिक संक्रांत साजरी करत आहोत. अगोदर घरामध्ये लपून बसावं लागायचं किंवा शेतामध्ये कामाला जायचं संक्रातीच्या दिवशी आमचा तोंडही पाहणं अपशकूनी समजलं जायचं. मात्र आता या कार्यक्रमामधून आमच्यातही वेगळं धाडस निर्माण झालं आणि आनंद वाटतो आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.

    या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर जोडीदार सोडून गेल्याच दुःख होतेच त्या आडून सन्मान मिळाल्याचा आनंद पण होता. अनेक महिला कित्येक वर्षानंतर या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक मुखाने आम्हाला सन्मानानं जगू द्या. आमच्या आयुष्यात वैधव्य हे काय आमच्या इच्छेने आलेले आहे का? अपघाताने आमच्या वाट्याला आलेल्या या विधवापणामुळे आम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात देखील सहभागी होण्याचा अधिकार दिला जात नाही. यामुळे आमची प्रचंड प्रमाणात घुसमट होते. अशा उपक्रमामधून आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाल्याचा प्रत्यय येतो, असे महिलांनी व्यासपीठावर बोलून दाखवले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad