राजकारणात कोणताही पक्ष कुणाचाही कायमस्वरुपी दुश्मन नाही-प्रकाश आंबेडकर
लातूर :प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रयोग केला... तो प्रयोग होता, बहुजन वंचित, दलित, कष्टकरी कामगार भटक्या विमुक्तांना सोबत घेऊन सत्तेचा गड सर करण्याचा... प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन अन् एमआयएमला साथीला घेऊन आकाराला आणलेली वंचित बहुजन आघाडी. वंचित समाजाच्या व्यक्तींना आंबेडकरांनी सत्तेचं स्वप्न दाखवलं. लाखा-लाखाच्या सभा घेऊन बहुजनांना साद घालून आंबेडकर लोकसभेला सामोरे गेले. भलेही २०१९ लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांसह सगळ्या उमेदवारांचा पराभव झाला, वंचितचा एकही खासदार किंवा विधानसभेला आमदार निवडून येऊ शकला नाही तरी वंचितमुळे राज्यातील अनेक बड्या नेत्यांना घरी बसण्याची वेळ आली. वंचितने मोठ्या प्रमाणावर मते खाल्ली. त्यामुळे आंबेडकरांवर भाजपला मदत केल्याचा आरोप झाला. आंबेडकर म्हणजे भाजपची बी टीम असंही म्हटलं गेलं. पण दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशी आंबेडकरांनी ठाकरेंसोबतच्या नव्या संसाराची घोषणा केली. पण त्यांनी वंचितसोबतच्या युतीसाठी आपले राजकीय दरवाजे मोकळे ठेवले आहेत. भाजपसोबत युती करण्यास तयार आहे असं सांगताना त्यांनी त्यासाठी भाजपला एक अट घातली आहे.
आंबेडकर म्हणाले, "राजकारणात कोणताही पक्ष कुणाचाही कायमस्वरुपी दुश्मन नाही. भारतीयांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण दुश्मनी असू शकत नाही. आरएसएस आणि भाजपशी आमचे टोकाचे मतभेद आहेत. मी अनेकवेळा जाहीर मंचावरुन ते मांडलेही आहेत. पण भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष जर मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत काम करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्या सोबत घरोबा करु शकतो"
मनृस्मृती सोडायची म्हणजे काय करायचं? महाडला बाबासाहेब आंबेडकर यांनी जशी मनुस्मृती जाळली होती, तेच मोहन भागवत यांनी नागपूरला करावं. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक, राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ आहे. त्यात भाजप, संघ बदल करणार असेल. तर त्याचं स्वागत करू, असंही आंबेडकर म्हणाले.