Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    OBC Reservation : अखेर 20 दिवसानंतर रवींद्र टोंगे यांचं उपोषण संपलं; फडणवीस यांची शिष्टाई

     




    OBC Reservation : अखेर 20 दिवसानंतर रवींद्र टोंगे यांचं उपोषण संपलं; फडणवीस यांची शिष्टाई


    चंद्रपूर | 30 सप्टेंबर 2023 : अखेर 20 दिवसानंतर रवींद्र टोंगे यांनी उपोषण सोडलं आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोंगे यांनी उपोषण पुकारलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण स्थळी येऊन टोंगे यांना ज्यूस दिला आणि त्यानंतर टोंगे यांनी उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल ओबीसी संघटनेने राज्य सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

    ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे यांनी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्यासोबतच विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी यांनीही गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. या तिघांनाही लिंबू पाणी देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं उपोषण सोडलं. याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे उपस्थित होते. यावेळी टोंगे यांनी आम्ही उपोषण आणि ओबीसींची सर्व आंदोलने मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

    काल ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शिंदे यांनी ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करणार नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणार नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळेच टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

    आम्ही सकारात्मक

    दरम्यान, राज्य सरकार ओबीसींच्या पाठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून आरक्षण दिलं जाणार नाही. ओबीसींच्या कोणत्याही मुद्द्यावर सरकारची नकारात्मक भूमिका नाही. आम्ही सकारात्मक आहोत. ओबीसींना निधी देण्यात आम्ही तसूभरही मागे हटणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

    ओबीसींच्या हितासाठी तत्पर

    काल ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी अडीच तास चर्चा केली. त्यात त्यांचे प्रश्न निकाली लागले. अजून काही प्रश्न असतील तर आम्ही अजूनही चर्चा करायला तयार आहोत. आम्ही ओबीसींचा एकही प्रश्न पेंडिग ठेवणार नाही. त्यांचे प्रश्न सोडवणार आहोत. ओबीसींच्या हितासाठी जे लोक काम करतात त्यांच्यासोबत चर्चा करण्यास आम्ही कधीही तयार आहोत. ओबीसींच्या उत्कर्षासाठी राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेत आलं आहे. यावेळीही घेणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    दोन समाज समोरासमोर येऊ नये म्हणून…

    मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत. पण म्हणून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता आम्ही आरक्षण देणार आहोत. दोन समाज समोरासमोर येणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ओबीसींना जे जे आश्वासनं दिली आहेत. ती पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad