ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा माझ्याकडे फॉर्म्युला : प्रकाश आंबेडकर

 




ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा माझ्याकडे फॉर्म्युला : प्रकाश आंबेडकर


लातूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मोठी आंदोलने केली जात आहेत. पण लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण पद्धत सुरू केली. तोच वारसा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून सुरू केला. त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा मी नातू आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्यायालयातून आरक्षण मिळवून देण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले

प्रकाश आंबेडकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे देताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. त्याचबरोबर भाजपवरही टीकास्त्र सोडले. देशात पुन्हा गोध्रा, माणिपूर सारख्या दंगली होण्याची शक्यता आहे. भारतवासीयांनी धैर्याने सामोरे जाण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीदिवशी येणारा सण दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे येत्या काळात धार्मिक दंगली घडवून आणण्याचा आरएसएस भाजपचा डाव हाणून पडला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवादाचे अस्त्र या सरकारने उपसले आहे. यातून अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांना भविष्यात तुरुंगात पाठवण्याचे काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर केंद्रात आतापर्यंत अनेकवेळा सत्ता बदल झाले. यावेळेस सत्ता बदल होताना अनेक गोष्टी घडल्या. सध्या देशात कंत्राटी नोकरभरती सुरु केली. मुख्यमंत्रिपदही कंत्राटी करावे, असा टोलाही त्यांनी सरकारला लागवला. कंत्राटी भरती करण्यासाठी नेमलेल्या चार खासगी एजन्सी अपात्र आहेत. त्या मोजक्यांनाच दिल्या आहेत. कंत्राटी पद्धतीने साधा बिगारी कामगारही घेण्याची परवानगी नाही; परंतु मोदी सरकार मनमानीपणे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही कंत्राटी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मनमानी संविधानविरोधी निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. यामुळे अशा निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.
कॅनडा सोबतच्या हुज्जतीने देशाची नाचक्की

गावचा सरपंच ज्या हुकूमशाही पद्धतीने गावातील लोकांशी वर्तणूक करतो, त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा देशासोबत हुकूमशाही पद्धतीने हुज्जत घातली आहे. यामुळे आपल्या भारत देशाची जगभरात नाचक्की झाल्याची खंतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे चिंधीचोर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मी इतकेच म्हणेन की चिंधी चोराने माझ्या नादी लागू नये, मी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आहे, त्यांनी आपल्या औकातीप्रमाणे राहावे, असा निशाणा प्रकाश आंबेडकर यांनी साधला.
.... तर स्वतंत्र लढणार

महाविकास आघाडीत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. आमचा साखरपुडा झालाय पण विवाह बाकी आहे. त्यासाठी दोन भटजी आडवे येत आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती झाली नाही तर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post