शिवसेना शिंदे गटाला भाजपचा ठेंगा? उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर दावा - latursaptrangnews

Breaking

Saturday, February 24, 2024

शिवसेना शिंदे गटाला भाजपचा ठेंगा? उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर दावा



 शिवसेना शिंदे गटाला भाजपचा ठेंगा? उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर दावा


Maharashtra Politics : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) दृष्टीने भाजपच्या क्लस्टर बैठका सुरू आहेत. गेली वर्षभर या पक्षाने अतिशय बारीक-सारीक तयारी केली आहे. त्यामुळे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचे पडसाद शुक्रवारच्या ( 23 फेब्रुवारी ) बैठकीत दिसून आले.


भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाशिक दिंडोरी आणि शिर्डी लोकसभा ( Shirdi Lok Sabha Election 2024 ) मतदारसंघाची क्लस्टर बैठक झाली. झारखंडचे खासदार समीर व्होरा यांनी त्यात आढावा घेतला. राज्याचे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील या क्लस्टरचे प्रमुख आहेत. आमदार डॉ. राहुल आहेर उपप्रमुख आहेत. आज ( 24 फेब्रुवारी ) शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बैठक शिर्डी येथे होईल.

या बैठकीच्या आधीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड अपेक्षा वाढल्या आहेत. ग्राउंड लेव्हलवरील राजकीय स्थिती लक्षात न घेता, या कार्यकर्त्यांनी नाशिक आणि शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी करून टाकली. या मागणीने महायुतीमध्ये नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप प्रमुख असलेल्या महायुतीत सध्या 23 राजकीय पक्ष आहेत. यातील अनेक पक्षांच्या अपेक्षा आपल्याला जागा मिळाव्यात, अशा आहेत. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवसेनेचा गट प्रमुख आहेत. अशा स्थितीत भाजपने नाशिक आणि शिर्डी या मतदारसंघांची मागणी करून उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. त्याचा निर्णय महायुतीच्या घटक पक्षाच्या पुढच्या बैठकीत होईल. मात्र, यातून मोठा राजकीय वाद निर्माण होऊ शकतो.


उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या आठ जागा आहेत. यातील डॉ. भारती पवार (दिंडोरी), डॉ. सुभाष भामरे (धुळे), डॉ. हिना गावित (नंदुरबार), उमेश पाटील (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), आणि डॉ. सुजय विखे पाटील (नगर दक्षिण) असे सहा मतदारसंघ आधीच भाजपकडे आहेत. हेमंत गोडसे (नाशिक) आणि सदाशिव लोखंडे (शिर्डी) हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. या दोन्ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत सर्वाधिक सहा जागा भाजपकडे असताना शिंदे गटाच्या दोन जागांवरही दावा ठोकल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या सहकारी पक्षांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटात अजित पवार गटाच्या दाव्याने आधीच अस्वस्थता होती. त्यात आणखी भर पडली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि निवृत्ती अरींगळे यांची नाशिकमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. पण, हेमंत गोडसे हे येथील विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी प्रचारदेखील सुरू केलेला आहे. अशीच स्थिती शिर्डी मतदारसंघात असून, तेथे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे, तसेच माजी मंत्री बबनराव घोलप हे संभाव्य उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच संकेतदेखील दिलेले आहेत. अशा स्थितीत अचानक भाजपची नवी मागणी पुढे आल्याने, शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे.


राज्यातील 48 जागा महायुती आपल्या घटक पक्षांसह लढणार आहे. अशा स्थितीत अजित पवार गटाला चार जागा मिळतील, असे संकेत आहेत. शिवसेनेकडे तेरा खासदार असल्याने या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. त्यातून उर्वरित 31 जागांवर भाजप उमेदवारी करण्याची शक्यता आहे. मात्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, खासदार नवनीत राणा, सदाभाऊ खोत तसेच अन्य पक्षांनी पाच ते सहा जागांवर दावा सांगितलेला आहे. त्यामुळे महायुतीच्या स्वतंत्र बैठकीत जागावाटपाबाबत पुढील निर्णय होऊ शकतो.


उत्तर महाराष्ट्रात आठपैकी आठ जागांवर भाजपने दावा केला आहे. त्यातून महायुतीच्या समन्वय बैठकीत वादावादी होणार, हे मात्र नक्की. खरोखर भाजप उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ जागा लढवून स्वबळाचा नारा प्रत्यक्षात आणू शकतील का? याची चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment