शेतात रात्री पाणी देण्यासाठी गेलेले आजोबा घरी परतलेच नाहीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला - latursaptrangnews

Breaking

Friday, December 16, 2022

शेतात रात्री पाणी देण्यासाठी गेलेले आजोबा घरी परतलेच नाहीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला



शेतात रात्री पाणी देण्यासाठी गेलेले आजोबा घरी परतलेच नाहीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला

 लातूर : शेतात रात्री पाणी देण्यासाठी गेलेले 71 वर्षीय आजोबा घरी परतलेच नाहीत, शोधाशोध केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या शरीराचे तुकडे शेतात विविध ठिकाणी सापडले. लातूर शहरापासून जवळच असलेल्या बाभळगाव येथे जिल्ह्याला हादरवणारी थरारक घटना समोर आली आहे. बशीर मदार शेख असं मयत व्यक्तीचं नाव असून या घटनेमुळे बाभळगाव पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

सध्या बाभळगाव परिसरात रात्रीचा विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते. बशीर सुद्धा पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जात असत

सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे बॅटरी घेऊन लुना दुचाकीवरुन शेताकडे गेले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. घरच्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शेतात लूना तशीच होती. त्यामुळे कुटुंबीय आणखी बुचकळ्यात पडले. त्यांनी शेताच्या आसपास आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र काहीच पत्ता लागला नाही. मात्र दोन दिवसांनी बशीर यांच्या शरीराचे तुकडे शेतात आढळून आले. हात, पाय आणि मुंडके धडावेगळे होऊन विविध ठिकाणी पडले होते. हे शरीराचे तुकडे पाहून पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तर आज दुपारी बशीर यांचे धड शेजारच्या शेतात विहिरीच्या भऱ्यावर आढळून आले. कायदेशीर प्रक्रिया करून बशीर यांच्या शरीराचे तुकडे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बशीर शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, दोन सूना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे बाभळगाव पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

खून की हिंस्र पशुचे बनले खाद्य ?

बशीर मदारी शेख यांचा मृतदेह ज्या पद्धतीने तुकड्या तुकड्यात सापडला त्यावरून हा खून होता की हिंस्र पशूने हल्ला करून त्यांना आपले खाद्य बनविले अशा शंका कुशंकांना उधाण आले होते. त्यामुळे वन्य जीव विभागाचे पथकाने ही घटनास्थळाची पाहणी केली. मात्र प्राथमिक अंदाजानुसार बशीर यांचा खून झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.


स्वभाव तर अगदी मनमिळावू

71 वर्षीय बशीर यांचा स्वभाव अगदी मनमिळावू वृत्तीचा होता. त्यांचे कधी कोणाशी भांडण झाले नाही. त्यामुळे त्यांचा खून का झाला असावा असा प्रश्न ग्रामस्थांनाही पडला असल्याचे बाभळगावचे ग्रामस्थ माने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment