अहमदनगरः डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या, मग बघा डोकं ठिकाणावर येईल, असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी केला आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराज या दाव्यामुळं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
देशात रोज ४० हजार लव्ह जिहादची प्रकरणे होतात. यासाठी वशीकरण व जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकाणावर येईल. सर्व भूत, प्रेम, तंत्र मंत्र बाहेर येईल, असा दावा कालीचरण यांनी केला आहे.
वशीकरण व जादूटोण्याचा वापर लव्ह जिहादसाठी केला जातो. भूतपिशाच्च नाही असे अनेकजण म्हणतात. मग हनुमान चालिसामध्ये भूतपिशाच्चचा उल्लेख कसा? हिंदू धर्मात पुनर्जन्म सिद्धांत, कर्मफल सिद्धांत व मनोविज्ञान आहे. अन्य कोणत्याही धर्मात ते नाही. गजवा-ए-हिंदच्या नावाखाली मागील ८०० वर्षांपासून भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
सर्व आतंकवादी मुस्लिमच आहे, ५ लाख मंदिर फोडली होती, सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर हिंदू राष्ट्र झालं असता असंही कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचा नाही तर हिंदूंचा राजा आहे. त्यामुळे प्रांतवाद व जातीवाद सोडा आणि हिंदू म्हणून एक व्हा, असंही त्यांनी सभेत बोलताना म्हटलं आहे.