Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    एकनाथ शिंदे सभेत म्हणाले, समृद्धी महामार्गावर ११ लाख झाडं लावू, लोकांनी बाहेर पडताच सर्व रोपं तुडवली



    एकनाथ शिंदे सभेत म्हणाले, समृद्धी महामार्गावर ११ लाख झाडं लावू, लोकांनी बाहेर पडताच सर्व रोपं तुडवली

     नागपूर: राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नागपूरमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग राज्यासाठी कशाप्रकारे गेमचेंजर ठरेल, याबद्दल आपले विचार मांडले. एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात समृद्धी महामार्गाचा उल्लेख इको-फ्रेंडली असा केला होता. मात्र, या सभेतील मोदींचे भाषण संपल्यानंतर बाहेर पडलेल्या लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ग्रीन कॉरिडोअरचे तीनतेरा वाजवल्याचे दिसून आले.


      समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर एम्स येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मोदींसमोर समृद्धी महामार्गाच्या वैशिष्ट्यांचा पाढा वाचला. समृद्धी महामार्ग उभारताना आम्ही सर्व काळजी घेतली आहे. हा रस्ता इको-फ्रेंडली आहे. या मार्गावर किमान ३५ लाख झाडं लावली जाणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीन कॉरिडोअर असेल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता.

      मात्र, ही सभा संपल्यानंतर लोकं जेव्हा बाहेर पडली तेव्हा त्यांनी एम्सच्या परिसरात लावलेली रोपं पायाने तुडवली. कोणतीही तमा न बाळगता सर्व गर्दी रोपांवरून चालत गेली. त्यामुळे ही नव्याने लावलेली ही रोपं पार झोपून गेली. या लोकांनी एम्स रुग्णालयाबाहेरील ग्रीन कॉरिडोअरची अक्षरश: वाट लावली. एम्सपासून समृद्धी महामार्ग हा काही अंतरावरच आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर ११ लाख झाडं अर्थात ११ लाखं रोप लावल्यानंतर राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा त्यांची काळजी घेऊ शकेल का, याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिणामी भविष्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या दाव्याप्रमाणे खरोखरच झाडं पाहायला मिळतील की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत. एखाद्या प्रकल्पानंतर पर्यावरणविषयक गोष्टींची काळजी घेण्याबाबत सरकारी विभागाचा यापूर्वीचा लौकिक पाहता समृद्धीच्या ग्रीन कॉरिडोअरबाबतही शंका घेण्यास निश्चित वाव आहे.

      उनको जंगल का फिल आवे, इसलिए हमने कोई कसर छोडी नही: एकनाथ शिंदे


      एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांना ये-जा करण्यासाठी उभारलेल्या अंडरपास आणि रोडपासचा उल्लेख केला. वन्यप्राण्यांच्या जीवनात बाधा येऊ नये, म्हणून आम्ही ही सुविधा केली आहे. जेणेकरून या प्राण्यांना महामार्गाच्या परिसरात असताना जंगलाचा फील येईल. त्यासाठी आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. समृद्धी महामार्गाच्या परिसरात २५० मेगावॅट सौरउर्जेची निर्मिती केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी १२०० पेक्षा जास्त तलाव निर्माण केले आहेत. एकूणच आम्ही सर्व घटकांचा विचार करून समृद्धी महामार्ग तयार केला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


      समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरेल: मुख्यमंत्री


      समृद्धी महामार्ग हा प्रकल्प राज्याच्या विकासाच्यादृष्टीने गेमचेंजर ठरेल. हा महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरेल. आता समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत सुरू झाला आहे. पुढील दहा महिन्यात मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग पोहोचेल. याच्या दोन्ही बाजूला आम्ही नवे नगर बनवण्याच प्रयत्न करतोय. लाखो लोकांना रोजगार देणारा हा समृद्धी हायवे होईल, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.

      No comments

      Post Top Ad

      Post Bottom Ad