बीडमधील तो पूल पुन्हा मृत्यूचा सापळा ठरला
बीड : परळीचा उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनत आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण या पुलावरील अपघातात आता पुन्हा एकदा दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्री एक रिक्षा आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रिक्षा आणि टिप्परच्या अपघातात राजेश सखाराम पोटभरे (वय २५ वर्ष) हा तरुण जागीच ठार झाला होता. तसंच आशिष ताठे हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला परळीत प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आशिषनेही प्राण सोडले आहेत.
अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून फरार टिप्पर चालकाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र या अपघातात दोन युवकांनी प्राण गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, परळीच्या उड्डाणपुलावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात. उड्डाणपुलावर वर्दळ असतानाही वाहने भरधाव वेगात चालवली जातात. त्यामुळे वाहनचालकांकडून वेगावर नियंत्रण ठेवलं जाईल, यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, परळीच्या उड्डाणपुलावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात. उड्डाणपुलावर वर्दळ असतानाही वाहने भरधाव वेगात चालवली जातात. त्यामुळे वाहनचालकांकडून वेगावर नियंत्रण ठेवलं जाईल, यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Tags
महाराष्ट्र