पुढचे ३ तास राज्यासाठी महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा - latursaptrangnews

Breaking

Tuesday, March 7, 2023

पुढचे ३ तास राज्यासाठी महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

 


पुढचे ३ तास राज्यासाठी महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई : सोमवारी रात्रीपासूनच भर उन्हाळ्यात राज्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. ठाणे, पालघर, नवी मुंबईतही सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुढच्या ३ तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बदलत्या वातावरणामुळे पुढचे ३ तास महत्त्वाचे आहेत. यामध्ये राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजही अवकाळी पावसाचा तडाका कायम आहे. मराठवाड्यामध्ये गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम चक्रवातामुळे अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात अवकाळी पाऊसचं सावट आहे. अशात ९ मार्चपर्यंत मुंबई, कोकण वगळता मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. संत्र्याच्या बागा उध्वस्त झाल्यात, काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी याचे देखील अतोनात नुकसान झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात अवकाळी पावसने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकवलेलं पावसाने धुवून काढलं. अवकाळी पावसाच्या या धुळवडीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. नाशिक, धुळे, जळगाव, पालघर, बुलडाण्यासह अमरावतीत आणि राज्यातील इतर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे.

No comments:

Post a Comment