ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला
पुणे, बारामती : पक्ष आणि चिन्ह ताब्यातून गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज पहिल्यांदाच बारामतीत आले आहे. पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी माढा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला. माढा मतदार संघातील मैत्री फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षसह कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी पक्ष आणि पक्ष चिन्ह गेल्याबाबत भाष्य केले
राजकारणामध्ये पक्ष उभे राहतात काहीजण पक्ष सोडून जातात ही प्रक्रिया चालू राहते. मात्र देशांमध्ये असं कधीच घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर खूण, चिन्ह सुद्धा दिले अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती दिली. हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही असेही पवार यावेळी म्हणाले. या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे पवारांनी सांगितले. याबाबतचा निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
दुसरी एक गोष्ट म्हणजे राजकारणात खूण किंवा चिन्ह गेल्याने फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो त्यापैकी पाच निवडणुका अशा होत्या की यामध्ये खूण वेगळी होती. एका निवडणुकीत बैलजोडी नंतर गाई वासरू नंतर चरखा, हात आणि मग घड्याळ या वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात आपण पाहिल्या आहेत त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की ती एकदा संघटनेची खूण आपण काढून घेतली तर त्या संघटनेचे अस्तित्व संपेल असं कधी होत नसते.
मात्र एक गोष्ट नक्की आहे की सामान्य माणसांशी संपर्क हा वाढवला पाहिजे. त्यांना नवीन आपली खूण सांगितली पाहिजे त्यामुळे फारशी अडचण येणार नाही. तुम्ही ज्या मतदारसंघातून काम करता त्या मतदारसंघातून मला तुम्ही निवडून दिले आहे. तो मतदारसंघ मला चांगला ठाऊक आहे . तुम्ही एकजुटीने आपली शक्ती पणाला लावली तर अनुकूल अशा प्रकारचा निकाल आपण या मतदारसंघातून देऊ. येत्या काही दिवसांमध्ये माढा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा यासंबंधीचा निर्णय लवकरच होईल असे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
No comments:
Post a Comment