मानवाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावण्याचे काम दर्जेदार ग्रंथांच्या माध्यमातून होते : रमेश बियाणी - latursaptrangnews

Breaking

Monday, March 4, 2024

मानवाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावण्याचे काम दर्जेदार ग्रंथांच्या माध्यमातून होते : रमेश बियाणी

 मानवाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावण्याचे काम

दर्जेदार ग्रंथांच्या माध्यमातून होते : रमेश बियाणी




लातूर : ग्रंथ हे माणसाचे मित्र तसेच मार्गदर्शकही असतात. मानवाच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका निभावण्याचे  काम दर्जेदार ग्रंथांच्या माध्यमातून होत असते असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद शिक्षण संस्था लातूर येथील मुख्य सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या लातूर ग्रंथोत्सव २०२३ चे उदघाटन सोमवारी सकाळी मा. रमेश बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते आपले विचार व्यक्त करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार भारत सातपुते हे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक रमेश चिल्ले, धनंजय गुडसूरकर, कालिदास माने, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे आदी मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी रमेश बियाणी व इतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचेही उदघाटन करण्यात आले.
ग्रंथाचे आणि आपले व्यक्तिशः अत्यंत जवळचे नाते असल्याचे नमूद करून रमेश बियाणी म्हणाले की, मानवाच्या जीवनात ग्रंथांचे  स्थान अत्यंत महत्वाचे असते. ग्रंथांमुळेच व्यक्ती आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने मार्गोत्क्रमण करून यशाचे उत्तुंग गाठू शकते. अगदी हजारो वर्षांपासून ग्रंथांच्या माध्यमातून मनुष्याला मार्गदर्शन मिळत आले आहे. आपले धार्मिक ग्रंथ रामायण नाते कसे असावे, राजधर्म काय आहे, कर्तव्यपरायणता शिकवून  महाभारत मनुष्याच्या जीवनात स्वार्थ मुख्य भूमिकेत  आल्यास काय घडू शकते हे दाखवण्याचे काम करते. ग्रंथांच्या, साहित्याच्या माध्यमातून आजघडीला आपण चांगली, समृद्ध परंपरा पुढे नेण्याचे काम करीत आहोत. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला कायम प्रेरित करण्याचे काम करतात. सध्यस्थितीत तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सोशल मिडियाचे  वाढते आक्रमण अत्यंत घातक  असल्याचे सांगून या माध्यमाच्या मदतीने व्यक्ती आपल्या मनात दबलेले विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत असतात ही बाब समाजाला नुकसानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथोत्सवासारखे उपक्रम वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याकामी मोलाची भूमिका वठवितात असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. कालिदास माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रंथ हे समाजाला दिशा देण्याचे , प्रकाश देण्याचे काम करतात असे सांगितले. धनंजय गुडसूरकर यांनी विद्यमान परिस्थितीत माणसाची समजून घेण्याची क्षमता घटत  चालल्याचे सांगितले. तर रमेश  चिल्ले यांनी वाचनाची सवय अगदी लहानपणापासून लावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात भारत सातपुते यांनी भौतिक गरजांपेक्षा आपले नाते  पुस्तकांशी अधिक घट्ट असल्याचे सांगितले. पुस्तक आयुष्यातून वगळल्यास माणसाचे आयुष्य शून्यवत होते. नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्याचे काम होणे आवश्यक आहे. ग्रंथ हे मानवाला नवे आयुष्य, नव्या प्रेरणा देण्याचे काम करत असतात. ग्रंथात खूप मोठी ताकद असते असे सातपुते यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.सी. पाटील गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र डेंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ. जयद्रथ जाधव, हरिश्चंद्र डेंगळे, हिरालाल पाटील, राम मेकले, प्रभाकर कापसे, आत्माराम कांबळे, संतोष करमले, सुशिल मेकले यांसह जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment