डायबिटीस : ही आहेत 7 लक्षणं, हा आजार टाळण्यासाठी काय करावं? वाचा
मधुमेह किंवा डायबिटीस हा आयुष्यभर सोबत राहणारा आजार किंवा आरोग्य विषयक समस्या आहे. दरवर्षी सुमारे 10 लाखांहून अधिक लोकांचा यामुळं मृत्यू होतो. हा आजार अगदी कोणालाही होऊ शकतो.
जेव्हा शरिर रक्तातील साखरेचा पूर्णपणे वापर करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. मधुमेहाच्या दुष्परिणामांमुळं व्यक्तीला हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, अंधत्व, किडणी निकामी होणे किंवा शरिराच्या खालच्या भागातील अवयवांच्या विच्छेदना याचा सामना करावा लागू शकतो.
त्यात ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंदाजे जगभरात 42.2 कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत. 40 वर्षांपूर्वीच्या आकड्यापेक्षा हा आकडा चार पटीनं वाढलेला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे आकडे सांगतात.एवढे धोके असूनही ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापैकी निम्म्या लोकांना तरी याबाबत काही माहिती नसते.
पण आपण दैनंदिन जीवनशैलीत चांगले बदल केल्यास अनेक प्रकरणांत ते रोखता येतात. कसे ते पाहू :
मधुमेह कशाने होतो?
जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा आपलं शरिर कार्बोहायड्रेटचं रुपांतर साखरेमध्ये (ग्लुकोज) करत असतं. नंतर आपल्या स्वादुपिंडामध्ये (पॅनक्रियाज) तयार होणारं इन्सुलिन नावाचं हार्मोन शरिरातील पेशींना ती साखर उर्जेसाठी शोषून घेण्याची सूचना करत असतं.
पण जेव्हा इन्सुलिन तयार होत नाही, किंवा ते व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा मधुमेह होतो. कारण त्यामुळं रक्तात साखर जमा व्हायला लागते.

डायबिटीसचे प्रकार कोणते?
मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत.
टाइप 1 डायबिटीसमध्ये पॅनक्रियाजमधील इन्सुलिनची निर्मिती बंद होते. त्यामुळं साखर रक्तामध्ये जमा व्हायला लागते.
शास्त्रज्ञांनाही अद्याप त्यामागचे नेमके कारण माहिती नाही. पण कदाचित हे अनुवांशिक परिणामांमुळं असू शकतं किंवा व्हारल इन्फेक्शन (विषाणू संसर्ग) झाल्यानं इन्सुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींचं झालेलं नुकसान त्यासाठी कारणीभूत असू शकतं, असंही शास्त्रज्ञांना वाटतं. जवळपास 10 टक्के मधुमेहग्रस्त टाइप 1 मधील असतात.
टाइप 2 डायबिटीसमध्ये पॅनक्रियाज पुरेशा इन्सुलिनची निर्मिती करत नाही किंवा ते हार्मोन व्यवस्थित काम करत नाही.
सर्वसामान्यपणे हे मध्यमवयीन किंवा ज्येष्ठांमध्ये दिसून येतं. पण त्याचबरोबर तरुणांमध्ये जास्त वजन किंवा बैठं काम असलेले किंवा एखाद्या विशिष्ट वंशातील आणि त्यातही दक्षिण आशियाई तरुण यांच्यात हा प्रकार आढळतो.
काही गर्भवती महिलांनाची या प्रकाराचं निदान होऊ शकतं. कारण त्यावेळी त्यांचं शरिर त्यांना आणि बाळाला दोघांना पुरेल एवढं इन्सुलिन तयार करू शकत नसतं.

वेगवेगळ्या निकषांच्या आधारे करण्यात आलेल्या अभ्यासांवरून असा अंदाज बांधण्यात आला आहे की, 6 ते 16 टक्के गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान डायबिटीसचं निदान होतं. यात वाढ हेऊ नये म्हणून त्यांना आहाराच्या माध्यमातून किंवा व्यायाम आणि गरज पडल्यास इन्सुलिनचा वापर करून साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.
लोकांना प्रिडायबिटीस म्हणजे रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याचे निदानही होऊ शकते आणि त्यामुळं डायबिटीस होण्याची दाट शक्यता असते.
डायबिटीसची लक्षणे काय आहेत?
सर्वसामान्यपणे दिसून येणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- खूप तहान लागणे
- नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी
- जास्त थकवा जाणवणे
- प्रयत्न न करताही वजन कमी होणे
- सारखे काही इन्फेक्शन होणे
- दृष्टी कमी होणे
- कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे
ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, टाइप 1 डायबिटीसची लक्षणं ही कमी वयात म्हणजे बालपणी किंवा पौगंडावस्थेत दिसतात आणि ते अधिक गंभीर असतं.
टाइप 2 मध्ये 40 वर्षापेक्षा अधिक (किंवा 25 वर्षांचे दक्षिण आशियातील) वयाचे लोक, पालक किंवा भावंडांना मधुमेह असलेले, जास्त वजन असलेले किंवा लठ्ठ तसंच दक्षिण आशियाई, चिनी, आफ्रो कॅरेबियन आणि कृष्णवर्णीय आफ्रिकन वंशाच्या लोकांना अधिक धोका असतो.

मी मधुमेह टाळू शकतो का?
मधुमेह हा प्रामुख्याने अनुवांशिक आणि पर्यावरणातील घटकांवर अवलंबून असतो. पण आरोग्यदायी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता.
प्रक्रिया केलेल्या साखरेचे पेय किंवा पदार्थ टाळून आणि पास्ता किंवा व्हाईट ब्रेड ऐवजी धान्य किंवा व्होलमीलचा वापर करणं हे त्यासाठीचं पहिलं आणि चांगलं पाऊल ठरू शकतं.
रिफाइन्ड साखर किंवा रिफाइन्ड धान्यातील पोषक तत्वे कमी असतात. कारण त्यातील तंतूमय किंवा जीवनसत्वं असलेला भाग काढून टाकला जातो. उदाहरण द्यायचं झाल्यास मैदा, व्हाईट ब्रेड, पांढरा भात, पास्ता, पेस्ट्रीज, साखरयुक्त पेये, मिठाई आणि साखर घातलेले नाश्त्याचे पदार्थ.
निरोगी आहारामध्ये भाजीपाला, फळे, कडधान्य, होल ग्रेन यांचा समावेश असतो. तसंच त्यात आरोग्यास फायदेशीर ठरणारे तेल, सुका मेवा आणि ओमेगा 3 नं भरपूर असलेले सार्डीन्स, सालमन असे मासे यांचा समावेश असतो.
तुम्ही काही ठरावीक वेळेनंतर थोडं थोडं खात राहणं आणि पोट भरल्यानंतर खाणं थांबवणं हेही महत्त्वाचं आहे.

व्यायामामुळंही तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. ब्रिटन्स नॅशनल हेल्थ सिस्टिमनं (NHS)दर आठवड्याला किमान अडिच तास अॅक्रोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात वेगानं चालणे आणि पायऱ्या चढणे यांचाही समावेश आहे.
निरोगी वजन तुमच्या शरिरात साखरेचं प्रमाण कमी ठेवण्याचा मार्ग सुकर करत असतं. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर त्यासाठी हळू हळू प्रयत्न करा. आठवड्याला अर्धा ते एक किलोने वजन कमी करा.
धुम्रपान (स्मोकिंग) टाळणे आणि कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर लक्ष असणे हेदेखिल हृदय विकारांचा धोका टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.
मधुमेहामुळं कोणत्या अडचणी वाढतात?
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास त्यामुळं रक्तवाहिन्यांचंही मोठं नुकसान होऊ शकतं.
जर तुमच्या शरिरात रक्ताचा प्रवाह योग्यप्रकारे होत नसेल तर ते गरजेनुसार तुमच्या शरिरातील अवयवांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं मज्जातंतूचं नुकसान (भावना, वेदना कमी होणं) होतं. तसंच दृष्टी कमी होणे आणि पायाला संसर्ग होणे याचे प्रकारही वाढतात.
अंधत्व, किडणी निकामी होणे, हार्ट अटॅक, पक्षाघात आणि शरिराच्या खालच्या भागातील अवयवांच्या विच्छेदनासाठी मधुमेह हे प्रमुख कारण असल्याचं WHO चं म्हणणं आहे.
2016 मध्ये अंदाजे 16 लाख मृत्यूमागचं थेट कारण हे डायबिटीस होतं.

डायबिटीस किती लोकांना आहे?
WHO च्या माहितीनुसार डायबिटीस असलेल्यांचा आकडा 1980 मधील 10.8 कोटींवरून वाढून 2014 मध्ये 42.2 कोटींवर पोहोचला.
1980 मध्ये जगभरात 5% पेक्षा कमी प्रौढांना (18 पेक्षा अधिक वयाचे) डायबिटीस होता. 2014 मध्ये ते प्रमाण 8.5% होतं.
इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या अंदाजानुसार जवळपास 80% प्रौढ मधुमेहग्रस्त रुग्ण मध्यम किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशांतील आहेत. या देशांत खाण्याच्या सवयी या वेगानं बदलत असल्याचं पाहायला मिळतं.
विकसित देशांमध्ये गरीबी आणि स्वस्त तसंच प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या सेवनाशी याचा संबंध आहे.
No comments:
Post a Comment