‘ते म्हणले श्रीराम म्हणा; आम्ही म्हणलो, राम बी आमचा, अली बी आमचा...आमची काय चूक?’ - latursaptrangnews

Breaking

Thursday, July 18, 2024

‘ते म्हणले श्रीराम म्हणा; आम्ही म्हणलो, राम बी आमचा, अली बी आमचा...आमची काय चूक?’

 


‘ते म्हणले श्रीराम म्हणा; आम्ही म्हणलो, राम बी आमचा, अली बी आमचा...आमची काय चूक?’

संघटनेचे लोक येणार आहेत माहीत होतं. पोलिसांनी सांगितलं घरात बसा दुकान उघडू नका. आम्ही त्यांना आसरा दिला, सहकार्य केलं. पाऊस होता म्हणून रेनकोट दिले. नंतर ते परत आले त्यांनी हल्ला केला.

ते म्हणाले 'श्रीराम म्हणा'. आम्ही म्हणालो की, राम बी आमचा आणि अली बी आमचा. आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही काय केलंय?"

विशाळगडच्या घटनेच्या दोन दिवसांनंतरही रेश्मा प्रभुलकरांचा आक्रोश थांबत नाही. भेटणाऱ्या प्रत्येकालाच त्या आम्ही काय केलंय ज्यामुळे आमच्या वाटेला ही परिस्थिती आली हा प्रश्न विचारतात. प्रभुलकरांच्या दुकानातली आग अजूनही विझली नाही.

छत्रपती संभाजीराजेंनी विशाळगडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रविवारी 14 जुलैला मोर्चाची घोषणा केली. पण, या मोर्चातल्या कार्यकर्त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात तोडफोड केली.

दुचाकी, चारचाकी अशा वाहनांसह घरातल्या सामानाची नासधूस केली. धान्य ठेवायचे पिंप सुद्धा फोडले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख याठिकाणी होते. त्यांच्यासमोरच हा सगळा हिंसाचार घडला. पण, पोलीस बघ्याची भूमिका घेत होते, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

याच हिंसाचारात प्रभुलकरांचं घर जळालं. या छोटेखानी घरात रेश्मा आणि त्यांची सासू कपडे, बांगड्या अशा वस्तूंचं दुकान चालवायच्या. हल्ला झाला तेव्हा दोघीही मुलांसोबत घरातच होत्या. हल्लेखोर इतके आक्रमक होते की, त्यांना घाबरून जीव वाचविण्यासाठी मुलांसोबत जंगलात पळून गेल्याचं त्या सांगतात.

मोर्चेकऱ्यांनी नाव घेऊन घेऊन घरांची तोडफोड केल्याचं ग्रामस्थ सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना इथलेच तय्यबअली नाईक म्हणाले, “देख देख के टार्गेट किया. नाव घेऊन दुकानं, घरं फोडत होते. हे याचं घर हे फोडा असं सांगत होते. आमच्या गावात असं वातावरण नव्हतं. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. हे सगळे लोक बाहेरून आलेले होते.’’

प्रभुलकरांच्या जळालेल्या दुकानाच्या पुढं तय्यबअली यांचं छोटसं हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे साधी पत्र्याची शेड आहे. पण, मोर्च्यातील कार्यकर्त्यांनी त्याचीही तोडफोड केली. आता ही नासधूस कशी सावरायची हे त्यांना समजत नाही.

मोर्चेकऱ्यांनी फक्त तोडफोडच केली नाहीतर तिथं ठेवलेल्या मुलांची पिगी बँक फोडून त्यातलेही पैसे नेल्याचं नाईक सांगतात.

गजापूरमध्ये करण्यात आलेली तोडफोड

फोटो स्रोत,NITIN NAGARKAR

फोटो कॅप्शन,गजापूरमध्ये करण्यात आलेली तोडफोड

गजापूरमधल्या प्रत्येकाची स्थिती प्रभुलकर आणि तय्यबअली यांच्यासारखीच आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणि चेहऱ्यावर एकच प्रश्न आहे की आता हे सावरायचं कसं?

घराच्या दर्शनी भागातल्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. शिवाय आत स्वयंपाक घरापर्यंत जाऊन सामानाची नासधूस केली. वर्षभरासाठी साठवून ठेवलेलं धान्य फेकण्यात आलं. ताटं, पाण्याच्या टाक्या, इलेक्ट्रिक मीटर, घरावर लावलेल्या डिश टीव्हीच्या छत्र्या सगळ्यांची तोडफोड केली. कपाटं, गाद्यांचंही नुकसान झालं.

इतकंच नाहीतर लहान मुलांच्या खेळण्यातल्या गाड्या आणि सायकल सुद्धा तोडफोड झालेल्या अवस्थेत अनेकांच्या घराबाहेर पडून आहेत.

गजापूर तोडफोड

फोटो स्रोत,NITIN NAGARKAR

अतिक्रमणाच्या नावाखाली घरांची तोडफोड करण्यात आली. पण, गजापूरमधल्या लोकांना आपणच जमीन दिल्याचं स्थानिक रहिवासी आणि माजी सरपंच संजय पाटील सांगतात.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना त्यांनी म्हटलं, "विशाळगड पायथ्याला माझा हॉटेलचा धंदा चालत होता. या लोकांना काहीच आधार नव्हता. मी सरपंच म्हणून काम करत होतो तेव्हा लोक पूर्णपणे निराधार होते. त्या कुटुंबांनी उदरनिर्वाह कशावर करायचा म्हणून माझा हॉटेलचा व्यवसाय होता तो यांना दिला."

विशाळगडावर मात्र ग्रामपंचायतीचे लाभार्थी सोडून इतरांनाच जागा देऊन व्यवसाय उभारू दिल्याचं ते सांगतात.

दिली.

घटनास्थळी जाण्यास पत्रकारांना बंदी

ही तोडफोड झाली त्यावेळी कोल्हापुरातले पत्रकार तिथं गेले होते. मात्र, त्यांना शूट करु नका अशा धमक्या देण्यात आल्याचं ते सांगतात. पण घटना झाल्यानंतर मात्र दोन दिवस पत्रकारांना जवळपास 20 किलोमीटर अलिकडेच अडवलं जात होतं.

पत्रकारच नव्हे तर मदत घेऊन निघालेल्या छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना देखील पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर फक्त 15 जणांना जाण्याची परवानगी दिली.

अखेर आम्ही जाणार अशी भूमिका पत्रकारांनी घेतल्यानंतर शेवटी स्वतःची वाहनं न नेण्याच्या अटीवर त्यांना गजापूरपर्यंत सोडण्यात आलं. पत्रकारांची अडवणूक कशासाठी? असा सवाल देखील विचारला जातोय.

हिंसाचारानंतर शाहू महाराजांनी काय म्हटलं?

कोल्हापूरचे खासदार आणि संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

त्यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘’विशाळगड इथले अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात अशी घटना घडली हे क्लेशदायी आहे. संभाजीराजेंनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. परंतु, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हिंसाचार झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.’’

या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत शाहू महाराज म्हणाले, ‘’विशाळगड प्रश्न गांभीर्यानं घेऊन माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणावी अशा सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना दिल्या होत्या. पण, राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. सरकारनं अतिक्रमण हटवण्यासाठी रविवारी जे आदेश दिले ते यापूर्वीच दिले असते तर अशी घटना घडली नसती.’’

इतकंच नाहीतर विशाळगडावरील अतिक्रमण दुजाभाव न करता सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनानं करावी, अशी मागणीही शाहू मराजांनी केली. तसेच आज मंगळवारी शाहू महाराज विशाळगड परिसराला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सतेज पाटील देखील असणार आहेत.

शाहू महाराजांनी निषेध करताच संभाजीराजेंनी काय म्हटलं?

शाहू महाराज यांनी संभाजीराजेंवर नाराजी व्यक्त करत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. याबद्दल संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली.

‘’शाहू महाराज माझे वडील आणि कोल्हापूरचे खासदार आहेत. तसेच ते सर्वांचे महाराज आहेत. त्या नात्याने त्यांनी निषेध नोंदवला. मी त्यांच्या भूमिकेचा स्वीकार करतो. पण, त्यांनी माझी भूमिका काय होती? हे खासदार म्हणून प्रशासनाला सांगावं,’’ अशी विनंतीही संभाजीराजेंनी शाहू महाराजांना केली.

‘’माझं आणि महाराजांचं याविषयावर बोलणं झालं होतं. आपण कोल्हापूरला प्रशासनासोबत बैठक लावू, असं त्यांनी मला सांगितलं. पण, हा विषय वरिष्ठ पातळीवर सुटू शकतो, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचं ठरलं होतं. पण, राज्य शासनाने मला चर्चेसाठी बोलावलं नाही. त्यामुळे शाहू महाराजांनी प्रशासन आणि राज्य सरकारवर ओढलेले ताशेरे अगदी बरोबर आहेत’’, असंही संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, इथं सगळ्यांचे अतिक्रमण हटवले जात आहेत. पहिलं अतिक्रमण हिंदू व्यक्तीचं निघालं आहे. त्यामुळे या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम असा जातीय रंग देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.



विशाळगड

No comments:

Post a Comment