गृहमंत्रिपद नेमकं कसं?

 


गृहमंत्रिपद नेमकं कसं?

मुंबई : महायुतीच्या महाविजयानंतर आता ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट लिहत याबाबत माहिती दिली होती. पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी देखील सुरु आहे. परंतु सत्तास्थापनेच्या या लगबगीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गृहमंत्रीपदावर अडून असल्याचे समजते. यावर छगन भुजबळांनी मोठे वक्तव्य केले आहे. गृह खातं जेवढं चांगलं आहे, तितकंच अडचणीचं देखील आहे, असे भुजबळांनी म्हणाले.

मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने एकनाथ शिंदेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येणार आहे. अशातच एकनाथ शिंदेंनी मात्र गृहमंत्रीपदासाठीही आग्रह धरला आहे. शिवसेनेवा गृहमंत्री पद मिळाले तरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील अशी सुत्रांची माहिती आहे. यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, 'गृहमंत्री पदावरून काही पेच नाही, त्याच्यावरून काही अडलेले नाही. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा बाहेर होते एका कॉन्फरन्समध्ये ते व्यस्त होते. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यास वेळ लागत आहे.'
'अंतर्गत चर्चा सर्व पक्षात झाली आहे, मंत्रिमंडळातील प्रत्येक खातं महत्वाचं आहे. गृह खातं जेवढं चांगलं आहे, तितकंच अडचणीचं देखील आहे. कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो त्याचे प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले जातात. मी गृहमंत्री असताना तर गँगवार सुरू होते. काळी दिवाळी देखील साजरी करण्यात येत होती. मुंबईत लग्न देखील त्यावेळी कोणी करत नव्हते. अशा सर्व बाबींना सामोरं जावं लागतं. गृहमंत्रिपद म्हणजे काही सोपं काम नाही. आता एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, यावर चर्चा करून मार्ग काढू, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

शपथविधी सोहळ्याचा मुहुर्त जवळ येत असताना छगन भुजबळांनी यावर देखील मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शपथविधीसाठी मोठी तयारी करावी लागते, उद्या राज्यपाल यांना वाटलं तर ते ६ तारीख देखील करू शकतात, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शपथविधीबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post