मुंबईतील जवळपास 50% हिरे व्यापारी आपला व्यवसाय सूरतला का हलवत आहेत? - latursaptrangnews

Breaking

Wednesday, November 1, 2023

मुंबईतील जवळपास 50% हिरे व्यापारी आपला व्यवसाय सूरतला का हलवत आहेत?

 


मुंबईतील जवळपास 50% हिरे व्यापारी आपला व्यवसाय सूरतला का हलवत आहेत?


वल्लभभाई लखानी … मुंबईच्या डायमंड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 1980 साली वल्लभभाई लखानी हे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातून मुंबईत आले. मुंबईत त्यांनी डायमंड ट्रेडींगचा व्यवसाय सुरू केला. पुढे तो वाढत गेला. सूरतमध्ये उत्पादन आणि मुंबईतून विक्री असं या व्यवसायाचं स्वरूप बनलं.

पुढे मुंबईच्या बीकेसीत (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) त्यांनी स्वतःचं ऑफीस घेतलं. आज त्यांच्या किरण जेम्स प्रा.लि. कंपनीचा वार्षिक उलाढाल 20 हजार कोटी इतकी आहे. पण इतक्या वर्षांनंतर मुंबईतला वाढलेला खर्च, महागाई, प्रवासाचा वेळ या सर्व गोष्टींचा विचार करून वल्लभाईंनी मुंबईहून सूरतला त्यांचा व्यवसाय हलवण्याचा निर्णय घेतला.

पण इतका मोठा व्यवसाय फक्त महागाईमुळे हलवण्याचा निर्णय घेतला आहे का? की अजून काही कारणं आहेत? यावर वल्लभ लखानी सांगतात, “आम्ही कोणीही नाराज होऊन जात नाही. केंद्र सरकारचा टॅक्स आम्हाला सर्व राज्यात सारखा आहे. पण मुंबईतल्या महागाईचा प्रश्न मोठा आहे.मुंबईच्या बिकेसीमधले जागेचे दर आणि इतर खर्च हा सूरतपेक्षा 10 पट जास्त आहेत. जर ते पैसे वाचले तर आम्ही आमच्या ग्राहकांना 2-5 टक्यांपर्यंत वस्तू स्वस्त दरात देऊ शकतो. यात ग्राहकांचा फायदा होईल.

छोट्या व्यापाऱ्यांना याचा अधिक फायदा होईल. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांचा सूरतला व्यवसाय हलवण्याचा आग्रह होता. मी त्याचा पुढाकार घेतला. मी 21 नोहेंबरला माझी पूर्ण कंपनी मुंबईहून सूरतकडे नेणार आहे. जवळपास मुंबईतील जवळपास 50% डायमंड ट्रेडर्स मुंबईतून सूरतच्या डायमंड बोर्समध्ये आपला व्यवसाय हलवतायेत.

आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी टाऊनशिप बांधत आहोत. मुंबईचा हजारो लोकांचा स्टाफ सूरतला शिफ्ट होईल.” सूरत डायमंड बोर्समध्ये मुंबईहून शिफ्ट होणारी वल्लभाई लखानी यांची किरण जेम्स प्रा. लि. ही पहीली कंपनी असेल.

सूरत डायमंड बोर्स मुंबईची कमतरता भरून काढणार का?

हे सर्व व्यापारी सूरतला बनलेल्या भव्य अशा सूरत डायमंड बोर्समध्ये आपला व्यवसाय हलवणार आहेत. सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी साधारण 3400 कोटी रूपये खर्च करून जागतीक दर्जाचं हिरे व्यवसाय केंद्र तयार केलं आहे.

अमेरिकेतील पेंटागॉनला जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखली जायची. पण सूरत डायमंड बोर्सच्या या इमारतीला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा किताब बहाल करण्यात आल्याचं इकडचे व्यापारी सांगतात.




मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्पेक्समधील भारत डायमंड बोर्स हे जागतिक दर्जाचं मोठं डायमंड कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये 2,500 कार्यालये आहेत. 2 लाख स्क्वेअर फूट इतकी जागा आहे. त्याचबरोबर एकावेळी या इमारतीत 40 हजार लोक येऊ शकतात.

सूरत डायमंड बोर्सची क्षमता यापेक्षा खूप जास्त बनवण्यात आली आहे. या इमारतीत एकावेळी 1 लाख लोक मावण्याची क्षमता आहे. 6,60,000 स्वेअर मीटरची ही इमारत आहे. या इमारतीत 4,700 कार्यालयांची क्षमता आहे. या इमारतीत नऊ टॉवर्स आहेत.

16 मजल्यांची ही इमारत 81.9 मीटर उंचीची असल्याची माहिती सूरत डायमंड बोर्सच्या व्यवस्थापनाने दिली. अनेक आधुनिक सुविधा या इमारतीत देण्यात आल्या आहेत.

ही इमारत बनण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. येत्या 17 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हिरे व्यापार केंद्राचं उद्घाटन होणार आहे.


सूरत डायमंड बोर्स व्यवस्थापनाचा भाग असलेले दिनेश नावडिया सांगतात, “बीकेसी बोर्स येथे भाड्याने दिलेलं त्याचं एक छोटं ऑफीस आहे. पण प्रचंड भाडं, मुंबईतील प्रवासाचा वेळ आणि इतर खर्च हा खूप वाढलाय. ही कारणं आम्हाला सूरतला व्यवसाय हलवण्यास भाग पाडणारी आहेत. उद्योगाच्या सुविधा लक्षात घेता आम्ही सर्व अत्याधुनिक सुविधा सूरत डायमंड बोर्समध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे सूरतला कमी खर्चात चांगला व्यवसाय करता येईल.”

सूरतला असंख्य हिरे कारखाने आहेत. हिऱ्यांचं सर्वात जास्त उत्पादन हे सूरतमध्ये होतं. जगातील 11 प्रकारच्या हिऱ्यांपैकी 9 प्रकारचे हिरे सूरतमध्ये बनतात. हिऱ्यांच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल सूरतमध्ये येतो.

सूरतच्या कारखान्यात तयार झालेले हिरे जगभरात निर्यात करण्यासाठी गुजरातमधून मुंबई, जयपूर , दिल्ली या राज्यात जावं लागतं मुंबईतून हिऱ्यांची सर्वात जास्त विक्री होते.

कस्टम हाऊस आणि मुंबईची आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हीटी यामुळे मुंबई हे हिऱ्यांच्या ट्रेडींगचं केंद्र बनलं होतं. पण गुजरात सरकारकडून सुरत डायमंड बोर्समध्ये मोठं कस्टम हाऊस उभारलं जात आहे. त्याचबरोबर आंतराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

जास्तीत जास्त देशांची विमानसेवा सुरू सुरतवरून सुरू करण्याचं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. जर ही विमानसेवा सुरू झाली तर कनेक्टिव्हीटीसाठी मुंबईसारख्या शहरांची गरज भासणार नाही असं व्यापारी सांगतात.

मग आता संपूर्ण बाजारपेठ सूरतला जाणार का? डायमंड मर्चंड घनश्याम ढोकलकिया सांगतात, “आम्हाला महाराष्ट्राबद्दल कोणतीही नाराजी नाही. कर हा केंद्र सरकारचा लागतो. त्यामुळे सगळ्या राज्यात हा कर सारखा आहे. आमचं उत्पादन सूरतमध्ये होतं. कोव्हीडनंतर भारतीय ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त हिऱ्यांची निर्यात होते.

मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ , कस्टम हाऊस यामुळे फायदा व्हायचा. जर हिऱ्यांची निर्यातच करायची असेल तर मुंबईतून करा किंवा सूरतमधून काही फरक पडत नाही. आता तिथेही त्या सुविधा आहेत. याउलट खर्चही कमी होतो आहे. पण सगळेच व्यापारी गुजरातला जाणार असं नाही. ज्यांचा व्यवसाय मुंबईत आहे ते इथेच राहतील.”

व्यवसाय गुजरातला जाण्यावरून राजकारण

वेदांता फॉक्सकॉन 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला. त्याचबरोबर टाटा एअरबसचा 21935 कोटींचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता पण तो गुजरातकडे गेला. ही ताजी उदाहरणं आहेत. यावरून राज्यात भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता सूरत डायमंड बोर्सकडे मुंबईतून व्यवसायिकांचं होणारं स्थलांतर यावरून मुंबईचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राज्याचं उद्योग धोरण चुकत असल्याची टीका केली. त्या म्हणाल्या, “मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातीर तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात ही खेदाची बाब आहे.”


सुप्रिया सुळे यांच्या टीकेला राज्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. देशातील सर्वात मोठं डायमंड क्लस्टर नवी मुंबईत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले, “देशातील बहुतांश लोक हे नवी मुंबई तसंच महाराष्ट्रात येणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यापार जात असतो. मी सूरतहून नंदुरबार आणि नवापूरला गेलो, तिथे गुजरातची एक टेक्सटाईल कंपनी येणार आहे. देशातील सर्वात मोठं डायमंड क्लस्टर नवी मुंबईत होणार आहे. यात गुंतवणूक झाल्यावर उद्योगमंत्री म्हणून मी स्वतः तुम्हाला गुजरात आणि महाराष्ट्रात किती उद्योग आहेत हे सांगेन”

No comments:

Post a Comment