मनोज जरांगे ते राज ठाकरे; महाराष्ट्र विधानसभेचा निकाल बदलवू शकणारे 5 फॅक्टर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक लढवण्यासाठी अर्ज करण्यासही सुरुवात झालीय. ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि तितकीच रंजक बनण्याची शक्यता दिसून येतेय.
महाराष्ट्रात प्रमुख सहा-सात पक्षांसह यंदा इतर घटकही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी, बदललेली राजकीय गणितं, सत्तांतर, आमदारांची निष्ठा, 2024 च्या लोकसभेच्या निकालात भाजपची झालेली निराशा, आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील विविध समुहांची तीव्र भावना अशा अनेक मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीला पूरक वातावरण निर्माण झालंय, असं म्हणत असतानाच, नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 'अनप्रेडिक्टेबल' वातावरण तयार झालंय.
कारण हरियाणात शेतकरी आंदोलनाचा प्रभाव निवडणुकीच्या निकालावर दिसला नाही. सत्ताधारी भाजपनंच पुनरागमन केल्याचं दिसून आलं.
महाराष्ट्रातही अनेक घटक कार्यरत आहेत. मराठा आरक्षणाचं आंदोलन असो वा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग असो. पण याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल का? हेच आम्ही राजकीय विश्लेषकांशी बोलून समजून घेतलं आणि तेच इथे मांडलं आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी प्रमुख लढत होत असली, तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलू शकेल असे प्रमुख 5 फॅक्टर राज्यात निर्माण झाले आहेत.
यात वंचित बहुजन आघाडी, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), परिवर्तन महाशक्ती, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन (एआयएमआयएम) यांचा समावेश आहे.
हे घटक किती परिणाम करतील, यावर बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे म्हणाले, "या सर्व घटकांचा वेगवेगळ्या ठिकाणी परिणाम होईल. विधानसभा मतदारसंघ साधारण अडीच-तीन लाख मतदारांचा असतो. त्यात तीन उमेदवार आणि वंचित, एमआयएम, मनसे, जरांगे, तिसरी आघाडी, बंडखोर यांचा विचार करावा लागेल."
"हे सगळेच सगळीकडे उभे राहतील किंवा प्रभाव पाडतील असं नाही. मात्र, तरीही यातील एक-दोघांनी 5 हजारांपर्यंत मते घेतली, तरी निकाल काय लागेल यासाठी निर्णायक ठरू शकतील," असं मत राजेंद्र साठे यांनी व्यक्त केलं.
1) वंचित बहुजन आघाडी
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा भाजपविरोधी पक्षांना, त्यातही विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. नांदेड, सोलापूर, अकोला यांसारख्या मतदारसंघात केवळ वंचितनं मोठी मतं घेतल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितची मतांची टक्केवारी कमी झाली. मात्र, तरीही वंचितने घेतलेली मतं अनेक ठिकाणी निर्णायक ठरल्याचं दिसलं.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी फॅक्टरच्या परिणामावर बोलताना राजेंद्र साठे कमी झालेल्या वंचितच्या जनाधाराकडे लक्ष वेधतात. ते म्हणाले, "वंचित आघाडीची मतं खूप कमी झाली आहेत. लोकसभेला त्यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचा किती परिणाम होईल हे सांगणं कठीण आहे.
"असं असलं तरी विदर्भात ते काही ठिकाणी प्रभाव दाखवू शकतात. यात मतदार काय विचार करतात त्यावरच ते अवलंबून आहे. आपलं मत वाया जाऊ नये असा विचार करून लोकांनी मत दिलं तर चित्र वेगळं असेल."
"प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आणि आरक्षणाच्या रक्षणाचा मुद्दा मांडला आहे. तो मुद्दा त्यांनी लावून धरला आणि भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी मांडणी केली तर त्याचा परिणाम होऊ शकतो," असंही राजेंद्र साठे नमूद करतात.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावावर बोलताना त्यांच्या मर्यादा आणि शक्तीस्थळे दोन्ही गोष्टींवर भाष्य केलं.
अभय देशपांडे म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीचा 2019 च्या निवडणुकीत जो परिणाम दिसला होता, तो या लोकसभा निवडणुकीत दिसला नाही. यावेळी वंचित आणि एमआयएम एकत्र नव्हते. तसेच यावेळच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध मविआ असं धृवीकरण झालं. त्यामुळे मतदारांनी जे पक्ष निवडून येऊ शकत नाही, केवळ मतविभाजन करतात अशा पक्षांना नाकारलं."
"जेव्हा मतदारसंघ छोटे होतात आणि उमेदवार दखल घेण्यायोग्य असतात तेव्हा स्थिती वेगळी असते. दक्षिण मध्य मुंबईचं उदाहरण घेतलं, तर चेंबूरमध्ये वंचितला 10 हजार मतं आहेत.
आता विधानसभेला त्याच प्रमाणात मतविभागणी झाली, तर मग नक्कीच त्याचा फटका मविआला बसू शकतो," असं म्हणत अभय देशपांडे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फरक अधोरेखित केला.
देशपांडे यांनी अगदी 1 हजार-2 हजार मतेही निकालावर मोठा परिणाम करू शकतात याकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले, "हरियाणाच्या निवडणुकीत १ हजार आणि दीड हजार मते घेणारे उमेदवार देखील निर्णायक ठरले. त्यामुळे निवडणुकीत असे खूप उमेदवार असणं आणि त्यांनी हजार, दोन हजार मतं घेणं हा निर्णायक मुद्दा ठरू शकतो."
वंचितची महाराष्ट्रात ताकद कोठे यावर बोलताना अभय देशपांडे म्हणाले, "वंचितची ताकद विदर्भात अकोल्यात, अमरावतीत आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी वंचितला दखलपात्र मते मिळाली होती. असं असलं तरी उमेदवार कोण, तो स्पर्धेत आहे की नाही या गोष्टीही विचारात घेतल्या जातील."
2) मनोज जरांगे आणि त्यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी मराठा समुहात मोठं जनमत तयार केलं आहे. याचा परिणाम 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठळकपणे जाणवला. बीड, जालन्यासह राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टरने निकाल बदलले. याचा मोठा फटका राज्यातील सत्ताधारी भाजपाला बसला.
मनोज जरांगे या फॅक्टरचा कोठे परिणाम होईल यावर बोलताना राजेंद्र साठे म्हणाले, "जरांगे म्हणत आहेत की, ते विजय होणार नाही, पण पाडू शकतील. मनोज जरांगे मराठवाडा आणि काही प्रमाणात सोलापूर, नाशिक, अगदी थोड्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील भागात परिणाम होऊ शकतो."

असं असलं तरी जरांगे फॅक्टरचा फटका कुणाला बसणार हे परिस्थितीनुसार बदलूही शकतं. यावर भाष्य करताना अभय देशपांडे म्हणाले, "मनोज जरांगे ज्या मतदारसंघात लढतील, उमेदवार देतील तेथे महाविकासआघाडीला फटका बसू शकतो. जेथे उमेदवार नसेल तेथे मतविभागणी टळून महायुतीला फटका बसेल."
"जरांगेंचा लोकसभा निवडणुकीत प्रभाव दिसला आहे आणि त्यात फार फरक पडलेला नाही. तो प्रभाव कायम आहे. ते मराठवाड्यातील किती मतदारसंघात निवडणूक लढतात त्यावर बरीच गणितं अवलंबून असतील," असंही अभय देशपांडे यांनी नमूद केलं.
3) मनसे आणि राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा तरुणांवर मोठा प्रभाव दिसून येतो. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या शहरी भागात मनसेचं बळ अधिक आहे. त्यामुळे या भागात मनसे किती मतदारांवर प्रभाव टाकते याचा परिणाम निकालावर होऊ शकतो.
मनसे फॅक्टरवर बोलताना राजेंद्र साठे म्हणाले, "मनसेचा मुंबई, ठाणे, कोकण या भागात शिवसेनेच्या ठाकरे गटाची मतं कमी करण्यासाठी वापर करून घेतला जाईल. मुंबईत जवळपास 32 जागा आहेत. त्यामुळे येथे मुख्यतः प्रभाव पडू शकतो."

यावेळी राजेंद्र साठेंनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या वारंवार होणाऱ्या भेटीकडे लक्ष वेधत त्या उल्लेखनीय असल्याचं म्हटलं.
मनसे फॅक्टरचा फटका जसा शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसू शकतो, तसा भाजप किंवा शिंदे गटालाही बसू शकतो, असं मत अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, "मनसेचा फॅक्टर मुंबईत ठाकरे सेनेसाठी अडचणीचा ठरू शकतो. नाशिकमध्ये मनसेचा परिणाम भाजप किंवा शिवसेनेच्या शिंदे गटावर होऊ शकतो. कारण येथील मनसेचा मतदार मनसे निवडणुकीत नसेल तर भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेकडे जातो. त्यांचाही परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकेल."
4) परिवर्तन महाशक्ती
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्तीचा प्रयोग होत आहे.
यात माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, शंकरअण्णा धोंडगे यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांचा त्यांच्या भागात प्रभाव आहे. त्यामुळे तेही काही ठिकाणी निवडणूक निकाल बदलू शकतात.
परिवर्तन महाशक्तीवर बोलताना राजेंद्र साठे म्हणाले, "परिवर्तन महाशक्तीचाही काही मतदारसंघात मर्यादित प्रभाव आहे. राजू शेट्टींचा इचलकरंजीत, संभाजीराजेंची फार ताकद आहे असं मला वाटत नाही.
बच्चू कडूंचा अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरात परिणाम होईल. मात्र राजकुमार पटेल बच्चू कडूंना सोडून गेले आहेत. त्यामुळे कडूंचा प्रभावही घटला आहे. पाडापाडी करण्यात बच्चू कडूंचा प्रभाव काही ठिकाणी दिसेल. गेल्यावेळी सोलापुरात प्रहार जनशक्तीचा प्रभाव दिसला होता."
"या घटकांचा फटका कुणाला अधिक बसेल अशी तुलना केली, तर बऱ्यापैकी फटका मविआला बसेल. कारण हे सगळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतं खातील. एरवी ही सत्ताविरोधी मतं मविआला मिळाली असती. ती मतं आता मविआला मिळणार नाहीत," असं म्हणत साठेंनी परिवर्तन फॅक्टर कुणाची अडचण करू शकतो हे नमूद केलं.

असं असलं तरी हे घटक काय भूमिका घेतात यावरही गोष्टी अवलंबून असणार आहेत. हाच मुद्दा उपस्थित करत राजेंद्र साठे म्हणाले, "बच्चू कडू महायुतीविरोधात भूमिका घेत असतील आणि त्यांनी कुणाला पाडायचं अशी भूमिका घेतली, तर चित्र वेगळं असू शकेल."
"दुसरीकडे राजू शेट्टींची जास्त नाराजी काँग्रेसवर आहे. त्यामुळे ते तेथे काँग्रेसच्या उमेदवाराला पाडू शकतात. मात्र मविआला अधिक फटका बसेल," असंही त्यांनी नमूद केलं.
अभय देशपांडे यांनी परिवर्तन महाशक्तीवर बोलताना सध्याच्या राजकारणात होत असणाऱ्या धृवीकरणाचा मुद्दा उपस्थित केला.
"परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीत एकत्र आलेल्या नेत्यांचा प्रभाव त्यांच्या मतदारसंघाच्या पलिकडे दिसेल असं वाटत नाही. तसं जेव्हा निवडणुकांमध्ये दोन गटात धृवीकरण होतं तेव्हा मतदार कमकुवत उमेदवारांना नाकारतात," असं निरिक्षण देशपांडे यांनी नोंदवलं.
5) एमआयएम फॅक्टर
मागील काही निवडणुकांमध्ये एमआयएमचा मुस्लीम समाजात मोठा प्रभाव दिसला. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव कमी झालेला दिसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एमआयएम फॅक्टरचा परिणाम काय होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
एमआयएम फॅक्टरचा किती प्रभाव होईल याविषयी बीबीसी मराठीने राजेंद्र साठे यांचं मत जाणून घेतलं. यावेळी ते म्हणाले, "एमआयएमचा खूप निर्णायक परिणाम होईल असं वाटत नाही. ते एक-दोन मतदारसंघात काही परिणाम करू शकतात. मुस्लीम समुदायाने मत वाया जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे आणि एमआयएमचा तोच मुख्य जनाधार आहे."
अभय देशपांडे यांनीही या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचा फारसा परिणाम दिसणार नाही, असंच मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "सध्याच्या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात एक भावना आहे. त्यामुळे मुस्लीम मतांची विभागणी होईल असं वाटत नाही."
"2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदार जसे महाविकासआघाडीच्या मागे उभे राहिले, तसाच तो विधानसभा निवडणुकीत राहील. इम्तियाज जलील यांच्यासारखे एक-दुसरे एमआयएमचे नेते विभागणी करू शकतात. ते वगळता सरसकट त्याचा परिणाम होणार नाही," असंही देशपांडे यांनी नमूद केलं.

ज्येष्ठ पत्रकार महेश सरलष्कर यांनी आतापर्यंत सर्व पक्षांनी उमेदवार घोषित केलेले नाहीत, हा मुद्दा उपस्थित केला. तसेच कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा राहतो, तेथील जातीची समीकरणं काय आहेत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असंही नमूद केलं.
"वंचित, राजू शेट्टी व इतर घटक काही ठिकाणी प्रभावी असू शकतात. राजू शेट्टी हातकणंगले, बच्चू कडू अमरावतीत असा निवडक प्रभाव असू शकतात. मात्र या घटकांचा 288 मतदारसंघांच्या निकालावर परिणाम होईल असं नाही," असं स्पष्ट मत महेश सरलष्कर यांनी व्यक्त केलं.
No comments:
Post a Comment